Amhi Bhagirathache Putra | आम्ही भागीरथाचे पुत्र

Amhi Bhagirathache Putra | आम्ही भागीरथाचे पुत्र
आम्ही भगीरथाचे पुत्र लिहिली कशी गेली? काश्मीर पाहून परतत असता गोनीदां भाकड-नानगल धरण-प्रकल्प पाहायला गेले. त्यावेळी धरण अर्ध बांधून झालं होतं. त्यांनी म्हटलं आहे - ‘मागे सतलजचं प्रचंड खोरं. तिच्या मार्गात दोन टेकड्या. त्यांच्यातील चिंचोळ्या प्रवाहात धरणाची भिंत उभी राहात असलेली. कुणा विराट पुरुषाच्या बंद मुठीतून खाली उडी घेत असावं, तसं सतलजचं प्रचंड पाणी झेपावत आहे. वाटलं की हा एका मोठ्या कादंबरीचा विषय आहे.’ गोनीदांचा कादंबरी लिहिण्याचा निश्चय झाला. पण त्यासाठी पुरेशी पूर्वतयारी करणं आवश्यक होतं. पंजाबचे त्या वेळचे राज्यपाल श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी आवश्यक ती मदत केली. मग पुन्हा एकदा त्या भागात प्रवास करून गोनीदांनी धरणाच्या पाण्याखाली जाणारा प्रदेश निरखला. तिथल्या जनलोकांशी संवाद साधला. मनं जाणून घेतली. भाषेचा ढंग अभ्यासला. लोककथा, लोकगीतं ऎकली. अशा पूर्वतयारीनंतर सत्य आणि कल्पिताचा गोफ विणत कादंबरी शब्दबध्द झाली. भाकडानंगल हे धरण उभं करणार्या आधुनिक भगीरथपुत्रांच्या संकल्पांचं, परिश्रमाचं, त्यागाचं आणि पराक्रमाचं चित्रण करणारं गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांचं शब्दशिल्प म्हणजेच ‘आम्ही भगीरथाचे पुत्र.’