Dhagdhagate Shejari | धगधगते शेजारी
Dhagdhagate Shejari | धगधगते शेजारी
अफगाणिस्थानातील सगळंच राजकारण एकमेकांना जिवे मारण्याचं, 'सफाया' करण्याचं. म्हणजे सगळ्या कुटुंबालाच मारून टाकण्याचं. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणुकीत हरल्या तेव्हा गुल अमिरने, आमच्या ड्रायव्हरने, मोठ्या काळजीने विचारलं होतं की, 'आता इंदिरा गांधींचा पण 'सफाया' करतील का? सफाया केला नाही तरी त्या, त्यांची मुलंबाळं जगतील कशी? त्यांच्या उदरभरणाची सोय काय ?' त्या वेळेस त्या प्रश्नांची उत्तरं देताना मला अभिमान वाटला होता की, आमच्याकडे लोकशाही आहे; आमच्याकडे तुमच्यासारखी मारामारी होत नाही. 'आम्ही' आणि 'ते' हा फरक तेव्हा जाणवला होता. आज मात्र ठामपणानं तसं काही वाटतं नाही. आज असं वाटत आहे की, सत्तेवर येण्यासाठी कोणी बंदूका आणि रणगाडे वापरतात तर कोणी मतं आणि पैसा यांची कोट्यवधींची गणितं मांडतात. त्यामध्ये आता गुंडगिरीची भर पडत आहे. साधनं कोणतीही असली तरी सर्वसामान्यांच्या आयुष्याची धूळधाणच होते. बंदुका, रणगाड्यांमुळे माणूस मरूनच जातो. गणितांच्यामुळे माणूस जगत राहतो; पण जीवनावरचा त्याचा विश्वास उडतो. साम, न्याय, नेकी हे दूर कुठेतरी फेकले जातात. या खेळामध्ये फक्त राजकीय सत्तेसाठी हपापलेलेच गुंतलेले असतात असे नाही; तर समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याची जबाबदारी असलेलेही आहेत. सर्वसामान्य माणूस दिशाहीन अवस्थेत, तत्काल फायद्यासाठी चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो. नाहीतर सर्वच बाबतीत उदासीन, तटस्थ होऊन जातो. हतबल होतो. सत्तासंपादनाची अमर्याद उर्मी आणि हतबलता यांची घट्ट वीण तयार होत जाते.