Goshta Hatatli Hoti | गोष्ट हातातली होती !

Goshta Hatatli Hoti | गोष्ट हातातली होती !
घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातलं अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं..पूर्व म्हणाली, केवळ काटकोनात आपल्याला उभं केलंय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात.आपली माती एकच आहे. अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही. आपण कुणाचंही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत.माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या. अहंकाराच्या विटांवर नम्रतेचं, निगर्वीपणाचं प्लॅस्टर. पक्कं बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. आणि हे दर्शविण्यासाठी सोहळे ! पश्चिम म्हणाली, मला माणसामाणसांतले हे व्यवहार कळत नाहीत. अहंकार नात्यानात्यांत गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं आर्किटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतीचे अश्रू !