Modi 2.0 Amoolagra Rajkeey Badalanchi Nandi | मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची नांदी

Modi 2.0 Amoolagra Rajkeey Badalanchi Nandi | मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची नांदी
देशाच्या राजकीय इतिहासात एक लक्षवेधी वळण २०१४च्या लोकसभा निवडणुकांनी आणलं. या निवडणुकांनी आणलेले बदल हा काही त्याआधीच्या सरकारला कंटाळलेल्या लोकांनी दिलेल्या कौलामुळं झालेला तात्पुरता बदल नव्हता. ज्या धारणा त्याआधीची सहा दशकं प्रमाण मानल्या जात होत्या त्याला हादरे देण्याची ही सुरुवात होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपनं बहुमतासह दिल्लीचं तख्त राखलं. या दोन्ही विजयाचे नायक मोदी हेच होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीतील अखेरच्या दोन वर्षांत भाजपचा सहभाग असलेल्या किंवा भाजपच्या आधीच्या सरकारहून आपला रंग वेगळा असल्याचं ठसवण्याची सुरुवात केली. मोदी नावाची राजकीय यशकथा ठसवणारीही ही वर्षं होती. त्यात प्रतिमानिर्मितीचा काळजीपूर्वक विणलेला खेळ महत्त्वाचा होता.'अच्छे दिन'चा वायदा करून सत्तेत आलेले त्यावर पुढची निवडणूक आली असताना बोलतही नव्हते, मात्र नवी स्वप्नं दाखवण्याचा उत्साह आणि ती लोकांच्या नजरेत, मनात उतरवण्याची हातोटी या बळावर मागचं आठवूही नये, असं नेपथ्य उभं करणं हे मोदीकाळातील भाजपचं यश. ते 'नया भारत'चं स्वप्न दाखवताना देशाच्या वाटचालीला नव्या मार्गावर घेऊन जायचा प्रयत्न करत होतं. मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय घुसळणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.